पहिला ‘गुलाबी’ विजय : भारताचा मायदेशात सलग १२ वा मालिका विजय
कोलकाता : भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
बांगलादेशने रविवारी ६ बाद १५२ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी ८९ धावांची गरज होती. भारताने ५० मिनिटांपेक्षा कमी वेळेत विजयाची औपचारीकता पूर्ण केली. विशेष म्हणजे, सलग चौथ्यांदा डावाने विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला.
मुशफिकूर रहीमचा (७४) अपवाद वगळता बांगलादेशचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. बांगलादेशचा दुसरा डाव ४१.१ षटकात १९५ धावात संपुष्टात आला. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावात आटोपला होता. या मालिकेत सलग दुसरी लढत ३ दिवसात संपली. २-० असा शानदार विजय मिळवताना भारताने १२० गुणांची कमाई करीत जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत अघाडी कायम राखली.
मुशफिकूरने वैयक्तिक ५९ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्याने आक्रमक पवित्रा घेताना ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. उमेश यादवने मुशफिकूरला माघारी परतवले. त्याचा फसलेला फटका जडेजाच्या हातात विसावला. त्याने १६ चौकार लगावले. महमुदुल्लाह (३९) रिटायर्ड हर्ट झाला होता. तो फलंदाजीसाठी आला नाही. यादवने त्यानंतर अल अमीन हुसेनला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडत भारताचा विजय निश्चित केला. यादवने दुसऱ्या डावात ५३ धावांत ५ बळी घेतले. त्याने या लढतीत ८१ धावांत ८ बळी घेतले. शमीने पहिल्या डावात ३६ धावांत २ बळी घेतले होते, पण दुसºया डावातही त्याने आपल्या तिखट माºयाच्या जोºयावर पाहुण्या संघावर वर्चस्व कायम राखले. ईशांतने या लढतीत ७८ धावांत ९ बळी (दुसºया डावात ५६ धावात ४) घेतले.