परराज्यातील शेतमालाची मुंबईत आवक वाढली
नवी मुंबई : सरसकट कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव व व्यवस्थापन खर्च, शेतीपंपासाठी मोफत वीज यांसारख्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. एकीकडे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांतील भाजीपाल्याची आवक कमी झाली असतानाच, परराज्यांतून मात्र कृषिमालाचा ओघ वाढू लागला आहे.
नवी मुंबईतील भाजीपाला बाजारात शनिवारी साडेपाचशे गाड्या भाजीपाला आला. यात सर्वाधिक गाड्या इतर राज्यांतून आल्या. सुरतमधून सव्वाशे गाड्या पोहोचल्या. यामध्ये भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवरचा समावेश होता. मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशातून मटार, कर्नाटकातून लाल भोपळा, सुरण, हिरव्या मिरच्या दाखल झाल्या. बेंगळुरूमधून टोमॅटो येत आहेत. याशिवाय गाजर, काकडी उत्तर प्रदेशातून आल्या. यामुळेच पुरवठ्यावर फार परिणाम जाणवला नाही, मात्र भाजीपाल्याचे दर मात्र वाढू लागले आहेत.