पंढरपूर आषाढी वारीसाठी एसटीच्या ३ हजार जादा बस
पुणे – पंढरपूरमध्ये होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळ यंदा नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे ३ हजार ७२४ जादा बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. पुणे येथे आषाढी एकादशी निमित्त करावयाच्या वाहतूक नियोजन बैठकीमध्ये ते बोलत होते.
संपूर्ण राज्यातून पंढरपूरला येणाऱ्या भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे सुमारे ५ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकारी पंढरपूर येथे १० ते १६ जुलैपर्यंत अहोरात्र कार्यरत राहतील, अशी माहिती रावते यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटी प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे, विठ्ठलाचे दर्शन घडवून सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या एसटीवर आहे. त्यासाठी जादा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेस या यांत्रिकदृष्ट्या निर्दोष, तंदुरुस्त असल्या पाहिजेत. तसेच त्या स्वच्छ व आकर्षक असल्या पाहिजेत, याबाबत संबंधित विभागांनी दक्ष राहावे, अशा सूचनाही रावते यांनी यावेळी केल्या.
आषाढी यात्रेनिमित्त औरंगाबाद विभागातून १०९७, पुणे १०८०, नाशिक ६९२, अमरावती ५३३, मुंबई २१२, तर नागपूर विभागातून ११० जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच यात्रा काळात बसस्थानकावर उपहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय इ. मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार असून, जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवाशी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.