पंढरपूरात अतिवृष्टीमुळे 30 हजार हेक्टर पिकांचे नुकसान
पंढरपूर । अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका रात्रीत आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई, डाळिंब यासह इतर अनेक पिके वाहून गेली. वर्षभर कष्टानं जोपासलेली पिके डोळ्यासमोर वाहून गेल्याने, शेतकऱ्याचं काळीज ही पुराच्या पाण्याने करपून गेले आहे. पंढरपूर तालुक्यातील 95 गावातील सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती, महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. प्राथमिक माहिती आणि नजर अंदाजानुसार जवळपास 30 ते 32 हजार हेक्टरावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे तर भीमा नदीकाठच्या जवळपास 25 ते 30 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यातच उजनी आणि वीर धरणातून भीमानदीत सुमारे तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीला महापूर आला होता. महापूरामध्ये शेती आणि शहरातील उद्योग व्यवसायिकांची अपरिमीत अशी हानी झाली आहे. भीमा नदीला आलेल्या पुराचा तालुक्यातील नदीकाठच्या 45 ते 50 गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.
शेती पिकांबरोबरच नदी काठी असलेल्या घरांचे आणि जनावरांच्या गोठ्याचं ही नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार जवळपास शहर व तालुक्यातील 14 ते 15 हजार घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. जवळपास 1 हजार लहान मोठी जनावरे दगावली तर सात जणांचे पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्राण गेले आहेत. पंढरपूर परिसरात पाच ते सहा साखर कारखाने आहेत. दरवर्षी 45 लाख टन उसाचे गाळप केले जाते. सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून पंढरपूरची ओळख आहे. याच उसाच्या खोऱ्यात यावर्षी महापूर आणि अतिवृष्टीने उसाचे अक्षरश: चिपाड झाले आहे.
नदीकाठी असलेल्या त्यांच्या दुकानात अनाचक पाणी शिरल्याने अनेक किंमती मशिनरी आणि फर्निचर पाण्यात बुडाले आहे. यामध्ये त्यांचे जवळपास 38 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे सुरू केली असली तरी नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.