निप्पल जॉईंटमधल्या गळतीमुळे रद्द करावं लागलं चांद्रयान २ च उड्डाण
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोला अखेरच्या क्षणी तांत्रिक बिघाड उदभवल्यामुळे महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेचं उड्डाण रद्द करावं लागलं. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली.
निप्पल जॉईंटमधल्या गळतीमुळे हेलियम गॅस बॉटल पुरेसा दबाव निर्माण करु शकली नाही. इंधन आणि ऑक्सिडायझर दबाव निर्माण करण्यासाठी हेलियम गॅस बॉटलचा वापर केला जातो. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. पण ५६ मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले आहे. याच चांगली बाब म्हणजे गळती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण रॉकेट खोलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुलै महिन्यातच पुन्हा चांद्रयान-२ चे अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे असे एका वरिष्ठ वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
हे नेमकं कशामुळे घडलं ते समजत नाही तो पर्यंत धोका कायम आहे. दुरुस्ती करणे शक्य आहे पण गळती कशी झाली ते समजलं नाही तर पुन्हा ही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. सध्या इस्त्रोचे वैज्ञानिक हे कशामुळे घडलं ते शोधून काढण्यावर मेहनत घेत आहेत. चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करण्याइतपत ही गळती गंभीर नव्हती पण इस्त्रोने कुठलाही धोका न पत्करता लगेचच उड्डाण रद्द केलं.
चांद्रयान-२ ९७८ कोटींचा प्रकल्प असून अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत चौथा देश असेल. सोमवारी रात्री हे प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातून सात हजार नागरीक श्रीहरीकोट्टा येथे गेले होते. मिशन कंट्रोल सेंटरमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: त्यावेळी उपस्थित होते.