नाना पाटेकरांनी तनुश्रीला व्हॅनिटीमध्ये बोलावलं होतं…प्रत्यक्षदर्शी स्पॉटबॉयचा खुलासा
एवढंच नाही तर नाना पाटेकरांनी जेव्हा तनुश्रीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं त्यानंतर तिथून ती तावातावाने बाहेर पडली. डान्स मास्टर गणेश आचार्य यांच्याकडे गेली आणि तिने आपली तक्रार केली. मात्र गणेश आचार्य यांनी तनुश्री दत्ताची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ती इंग्रजीत भांडू लागली. ती जे काही बोलत होती त्यावरून इतकेच समजत होते की नाना पाटेकरांनी काहीतरी चुकीचे वर्तन केले आहे. तिच्या बोलण्याचा सगळा रोख तसाच होता. मात्र सगळेजण तनुश्रीची समजूत घालत होते. नाना पाटेकर मोठा माणूस आहे तुझे करीअर बरबाद होईल असे तिला सांगितले जात होते. मात्र तनुश्रीने कोणाचेही ऐकले नाही. तनुश्री तिची बाजू ओरडून ओरडून सांगत होती. काही वेळातच ती तिथून निघून गेली. थोड्या वेळाने नाना पाटेकरही व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आले. काही घडलेच नाही अशा अविर्भावात ते वावरू लागले. पण शुटिंग बघणाऱ्या स्पॉटबॉना त्यांच्या रोजगाराची चिंता असल्यामुळे कोणीही काही बोलले नाही.
या संपूर्ण प्रकरणात मी कोर्टात साक्षही द्यायला तयार आहे असेही रामदास बोर्डे यांनी सांगितले. तनुश्री दत्ताच्या बाबतीत जे घडले ते अनेक नवख्या अभिनेत्रींबाबत आत्तापर्यंत घडत आले आहे. मला आता माझ्या जिवाची आणि रोजगाराची पर्वा नाही फक्त सत्य समोर यावे हाच माझा उद्देश आहे असेही बोर्डे यांनी सांगितले आहे. कलाकार सोडून जे कोणी लोक त्या ठिकाणी होते त्यांना हेच वाटत होते की नाना पाटेकर चुकीचे वागले आहेत. तनुश्रीला त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावले होते आणि तिथूनच या सगळ्या वादाला तोंड फुटले असेही बोर्डे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यादिवशी तनुश्रीने ड्रग्ज घेतले होते आणि गणेश आचार्य यांचा फोन आल्यावर मी लगेच सेटवर पोहचले असे अभिनेत्री राखी सावंतचे म्हणणे आहे. हे सगळे म्हणणे खोटे आहे. तनुश्रीने ड्रग्ज घेतले असते तर गाण्याचे टेक ती देऊच शकले नसते. राखी स्वतः सेटवरही पोहचली नव्हती कारण त्यानंतर दोन दिवस शुटिंगही झाले नव्हते असेही बोर्डे यांनी सांगितले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोर्डे यांनी हा खुलासा केला आहे.
नाना पाटेकर म्हणत आहेत की 300 पेक्षा जास्त लोक त्यावेळी सेटवर होते तिच्यासोबत मी चुकीचं कसं वागेन असं नाना पाटेकर आता विचारत आहेत. सेटवर काहीही झाले नाही, मात्र व्हॅनिटी व्हॅनमध्ये तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरच होते. तिथे काय घडले ते आम्हाला कोणालाही माहित नसते असेही बोर्डे यांनी सांगितले.