वीजबिल भरणार नाहीच; ऊर्जामंत्र्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन घोषणा कराव्यात: राजू शेट्टी
कोल्हापूर | प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. शिवाय, कोणतीही घोषणा करताना ऊर्जामंत्र्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, बेजबाबदारपणे कोणतीही घोषणा करू नये, असा सल्ला सुद्धा शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना दिला आहे.
सक्तीची वसुली, ही गोड बातमी?, शेट्टींचा सवालऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे नुकतेच वक्तव्य केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी राऊत यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ, अशी घोषणा केली होती. याबाबतच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राजू शेट्टी म्हणाले, ‘वीजबिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय? नितिन राऊत यांना कोणतेही अधिकार नसतील तर, पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी.’
लॉकडाऊनमध्ये सगळे काही बंद होते. कुणाच्या हाताला कामे नव्हती. गोरगरीबांकडे पैसा नाही. ही वीजबिले भरायची कशी? सर्वसामान्य माणसाला सरकारने घरात कोंडून ठेवले होते. लोकांच्याकडे पैसे नाहीत म्हणून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करावीत, अशी आमची माफक मागणी आहे. मात्र वीजवितरण कंपनीने वसुली करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने काहीसे पॅकेज दिले, मात्र राज्य सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही, असेही शेट्टी यांनी सांगितलं.
अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करू
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यापुढे कोणतीही घोषणा करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच जनतेला आश्वासने द्यावीत, असे सांगतानाच, सरकारने त्वरित वीज बिले माफ करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन होत करू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.