नवलखा यांच्या याचिकेच्या सुनावणीतून पाचव्या न्यायाधीशांची माघार
- कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरण
नवी दिल्ली : नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीतून गुरुवारी न्या. एस. रवींद्र भट यांनीही माघार घेतली. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीतून माघार घेणारे सर्वोच्च न्यायालयातील ते पाचवे न्यायाधीश आहेत.
कोरिगाव-भिमा हिंसाचारप्रकरणी नवलखा यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला त्याला आव्हान देणारी याचिका नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ३० सप्टेंबर रोजी या खटल्याच्या सुनावणीतून माघार घेतली होती. त्यानंतर या पीठातील न्या. एन. व्ही. रमण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. बी. आर. गवई यांनी १ ऑक्टोबर रोजी सुनावणीतून माघार घेतली होती.
न्या. अरुण मिश्रा, न्या. विनीत सरण आणि न्या. ए. रवींद्र भट यांच्या पीठासमोर गुरुवारी याचिका सुनावणीसाठी आली असता न्या. भट यांनी या याचिकेच्या सुनावणीतून माघार घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने नवलखा यांना अटकेपासून तीन आठवडय़ांसाठी संरक्षण दिले होते त्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे, असे नवलखा यांच्या वकिलांनी पीठाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा शुक्रवारी नव्या पीठासमोर सुनावणी होईल, असे या पीठाने सांगितले. याबाबत कोणताही आदेश जारी करण्यापूर्वी म्हणणे ऐकून घ्यावे असे कॅव्हेट महाराष्ट्र सरकारने दाखल केले आहे.