नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे मार्गदर्शकतत्त्वे जाहीर
कोरोना विषाणूच्या काळात सध्या सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध घातले जात आहेत. यामध्ये सण-उत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम यांचाही समावेश आहे. नुकताच गणेशोत्सवाचा सणही अशाच साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. आता देशात वेध लागले आहेत ते नवरात्रीचे . महाराष्ट्रील मुंबई, पुण्या सारख्या शहरांमध्ये तर नवरात्र उत्सवाची मोठी धूम असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केली आहेत. नवरात्राच्या काळात गर्दी होऊन कोरोना विषाणुचा प्रसार होऊन नये म्हणून सरकारने काही नियम घालून दिले आहेत.
नवरात्रीमध्ये घरात तसेच मंडपात देवीची मूर्ती बसवली जाते. त्याबाबत आता घरात असलेल्या मूर्ती 2 फूटांपेक्षा जास्त उंच असू शकत नाहीत आणि मंडपांमधील मूर्त्या 4 फूटांपेक्षा कमी असाव्यात, असे सरकारने सांगितले आहे. हिंदू पंचांगानुसार, या वेळी शारदीय नवरात्र पुढील महिन्यात 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 25 ऑक्टोबर रोजी त्याचा समारोप होईल. दरम्यान, संपूर्ण नऊ दिवस आई दुर्गेच्या नऊ प्रकारांची पूजा केली जाईल. या वेळी अनेक भक्त दुर्गा देवीचे उपवास आणि पूजा करतात.
याच काळात पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने दुर्गा पूजा उत्सवासाठी पंडाल उभारण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ममता सरकारने सर्व बाजूंनी पंडाल उघडे ठेवणे, भक्त, आयोजक आणि इतरांनी मास्क वापरणे, तसेच जागोजागी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवणे यांसारख्या अटी घातल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एकच जागी 100 लोक येता कामा नये, असही सांगण्यात आले आहे.