देशात ५ वर्षांत हत्तींमुळे २ हजार बळी
- वाघांच्या हल्ल्यात २२४ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : मागील ५ वर्षांत हत्तींमुळे देशभरात २३९८ जणांचा बळी गेला असून वाघांमुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी लोकसभेत शुक्रवारी दिली.
गेल्या पाच वर्षांत हत्ती आणि वाघांमुळे किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न केरळचे खासदार अँटो अँटेनिओ यांनी विचारला होता. या प्रश्नाला केंद्रीय पर्यावरण राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी लेखी उत्तर दिले यात ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी हत्ती आणि मनुष्य यांच्या संघर्षांत ४९४ जणांचा बळी गेला आहे, तर २०१४ पासून मार्च २०१९ पर्यंत २३९८ जणांचा मृत्यू झाला. हत्तींच्या हल्ल्यांमुळे २०१७-१७ला ५१६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या तुलनेत २०१८-१९ मध्ये बळींमध्ये घट होऊन ४९४ जणांचा बळी गेल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
वाघांच्या हल्ल्यात गेल्या पाच वर्षांत एकून २२४ जणांचा बळी गेला असून सर्वाधिक ७१ जणांचा मृत्यू पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. इतर प्राण्यांमुळे होण्याऱ्या मृत्यूची माहिती एकत्रित केली नसल्याने केवळ हत्ती आणि वाघांमुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी देण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
पाण्याची, अन्नाची कमतरता यामुळे जंगली प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
* भारतात ५० व्याघ्र अभयारण्य
* जगभरातील वाघांपैकी भारतात ७० टक्के वाघ
* पश्चिम बंगालमध्ये हत्तींच्या हल्ल्यात ४०३ जणांचा बळी
* नागालॅण्डमध्ये ३९७ तर झारखंडमध्ये ३४९ जणांचा मृत्यू
* वाघांमुळे गेल्या पाच वर्षांत २२४ जणांचा बळी
* सर्वाधिक ७१ मृत्यू पश्चिम बंगालमध्ये
* २०१७ मध्ये भारतात २७,३१२ हत्तींची नोंद
* २०१४ मध्ये २२२६ वाघांची नोंद