देशात २४ तासांत ५७,९८२ नवे रुग्ण
नवी दिल्ली – चार महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. तर याउलट कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. मागील २४ तासांत देशात ५७ हजार ९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २६ लाख ४७ हजार ६६४ वर पोहोचली आहे. यापैकी ५० हजार ९२१ रुग्णांनी आपला जीव गमावला असून १९ लाख १९ हजार ८४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या ६ लाख ७६ हजार ९०० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चिंताजनक बाब म्हणजे सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा जास्त रुग्ण भारतात मागील सात दिवसांत आढळून आले आहेत.