देशात ही शेवटची लोकसभा निवडणूक: साक्षी महाराज
उन्नाव – 2014 मध्ये देशात मोदी लाट होती, ती आता 2019 मध्ये त्सुनामी झाली आहे. त्यामुळे ही देशातील शेवटची लोकसभा निवडणूक आहे, यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाहीत, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बोलताना साक्षी महाराजांनी मोदींची स्तुती केली आहे. देशाच्या नावावर ही शेवटची निवडणूक असेल. यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाही आणि त्याची गरजच नसणार आहे. याला जबाबदार मोदी लाट आहे. सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या साक्षी महाराजांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी हे वक्तव्य केले आहे.
साक्षी महाराज म्हणाले, की जगातील कोणतीच शक्ती आता मोदी त्सुनामीला रोखू शकत नाही. मी एक संन्यासी असून, माझ्या डोक्यात जे येते ते मी बोलत असतो. यंदा होणारी ही एकमेव निवडणूक आहे की जी देशाच्या नावावर लढली जाणार आहे. देशात सध्या जागृती निर्माण झालेली आहे. देशात चर्चा आहे, की देश हा मोदींमुळेच आहे. त्यामुळे ही एका पक्षाची निवडणूक नाही.
साक्षी महाराजांच्या वक्तव्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे, की भाजपने आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. मोदी आणि शहा ही जोडी पुन्हा निवडून आली तर ते संविधान बदलतील आणि निवडणुका बंद होतील. हिटलरने पण असेच केले होते.