देशातील मुलींच्या सन्मानासाठी ‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवा -पंतप्रधान मोदी
महाईन्यूज | प्रतीनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मोदी यांनी महिला सबलीकरणाबरोबर महिला सन्मानाकडं भारतीयांचं लक्ष वेधलं. माेदी म्हणाले, “आजपासून उत्सवांचा काळ सुरू होतोय. देशभरात उत्सवाची रोषणाई राहिल. दिवाळीमध्ये सौभाग्याचं आणि समृद्धीच्या रूपाने लक्ष्मीचं आगमन होतं. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी म्हटलं जातं. मुलगी समृद्धी आणते. या दिवाळीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींचा-सूनांचाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊन सन्मान करून वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करताना #bharatkilaxmi हॅशटॅग वापरा,” असं आवाहन मोदी यांनी केलं.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना सणउत्सवांच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी बेटी बचाओपासून ते प्लास्टिकमुक्तीपर्यंतच्या विषयांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, “दिवाळीत आतीषबाजी होते. पण हा आनंद साजरा करत असताना कुठे फटाक्यांमुळे आग लागणार नाही ना? याची काळजी घ्या. आनंद असावा. कुणाला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. या उत्सवाच्या काळात अनेक लोक सणांच्या आनंदापासून वंचित राहतात. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हणतात. दिवाळीत काही घरं प्रकाशाने न्हाऊन निघतील, तर दुसरीकडे काही घरं अंधारात राहतील. काही घरात मिठाई खराब होत असते, तर काही घरात मुलं मिठाईची वाट बघत बसतात. काही घरात कपड्यांनी कपाट भरतील, तर काही घरं अंग झाकायला कपडे नसतील. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हटलं जातं. जिथे आनंद जात नाही. तिथे आनंद वाटला पाहिजे. म्हणून आपल्या घरात इनकमिंग डिलिव्हरी होते. एकदा तरी अशा गरीब कुटुंबात आऊटगोईंग डिलिव्हरी करण्याचा विचार करायला हवा. सण उत्सवाच्या काळात गरीब कुटुंबात आलेलं हास्य आपला आनंद द्विगुणीत करेल,” असं आवाहन मोदी यांनी केलं.