दादर-सावंतवाडी दरम्यान ‘तुतारी’ एक्सप्रेस धावणार; चाकरमान्यांना दिलासा
रायगड | कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावर दादर ते सावंतवाडी दरम्यान येत्या 26 सप्टेंबरपासून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. तुतारी एक्सप्रेस असं या गाडीचं नाव आहे. कोकण रेल्वेमार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याने लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या मुंबईकरांना आता कोकणात जाता येणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावर ही विशेष लोकल चालवण्याचा रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेमार्फत या गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. तुतारी एक्सप्रेस येत्या 26 सप्टेंबरपासून दादर ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते दादर दरम्यान दररोज धावणार आहे. विशेष म्हणजे कोकण रेल्वे मार्गावरील ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ आदी सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर या गाडीला थांबा असणार आहे.
31 सप्टेंबरपर्यंत ही गाडी मान्सूनच्या नियमाप्रमाणे धावणार आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून ही गाडी नॉन मॉन्सूनच्या वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहे. लॉकडाऊननंतर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही दुसरी प्रवासी रेल्वे असणार आहे. आज रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून ही महत्त्वाची माहिती दिली आहे.