”तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,” शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं
मुंबईः शिवसेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्तेच्या वाटपावरून भाजपावर निशाणा साधला. सत्तेच्या पदांचं समसमान वाटप व्हावं. जे हक्काचं आहे, न्यायाचं आहे, त्याविषयी आम्ही बोलतोय. युती आहे आणि युतीमध्ये बोलणी होऊ शकतात. भाजपावाले म्हणाले होते, सत्तेचं समसमान वाटपं होईल, मग सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेनं कुठलंही पाऊल मागे घेतलेले नाही. मुख्यमंत्रिपद हे एनजीओचं पद आहे काय?, मुख्यमंत्रिपद हे सत्तेचं पद आहे. समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचं 50-50 वाटप करणं असतं. शिवसेना कोणत्याही पदांसाठी अडून बसलेली नाही. भाजपानं सामंजस्यानं घ्यायला हवं. विनाशकाले विपरित बुद्धी आमची नव्हे, तर त्यांची झाली आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी मुनगंटीवारांवर केली आहे. भाजपाजवळ 145चा आकडा असल्यास त्यांनी केव्हाही सरकार स्थापन करावं. भाजपाच नव्हे, तर इतर कोणाकडेही 145 आमदारांचं समर्थन असल्यास त्यांनी खुशाल सरकार तयार करावं, असं म्हणत त्यांना भाजपाला टोलाही हाणला आहे.