…तरी देवेंद्र फडणवीस टीकाच करणार, अनिल देशमुख यांचा टोला
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. दरम्यान फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात, असं ते म्हणाले.
“कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे,” अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.
वाचाः फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी
“भिडे, एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.
सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे यावर, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत, त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही”, असा खोचक टोला देशमुख यांनी लगावला.