प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ‘डेंग्यू’ने भावंडांचा मृत्यू, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संताप
- पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्याची ‘ऐशी की तैशी‘
- संदीप काटे यांनी वैद्यकीय विभागावर ओढले ताशेरे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला. थेरगाव परिसरातील पडवळनगरमध्ये डेंग्यूमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पालिकेचा वैद्यकीय विभाग काय झोपा काढतो काय ? असा उद्विग्न सवाल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व ठेकेदारांनी शहरातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वत्र कचर्याचे ढीग साचले असून गटार, नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत आहेत. पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचा शुक्रवारी (दि १३) पहाटे मृत्यू झाला. तर, त्याचाच ९ महिन्याने लहान असलेला भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
…अन्यथा आयुक्तांच्या विरोधात आंदोलन
शहर स्मार्ट सिटीकडे झेपावत असताना नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुविधांवर कोट्यावधी रुपये खर्च करते. त्यातून पैशांचा चुरडा होताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांचा देखील पालिका प्रशासनावर वचक दिसत नाही. केवळ टक्केवारीवर भर देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी नागीरकांच्या आरोग्य सुविधांकडे कानाडोळा करून चालणार नाही. अन्यथा नागरिकांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल. पालिकेने संबधित बालकांच्या कुटुंबियांना मोठा आधार द्यावा, आरोग्याच्या बाबतीत नागरिकांत व्यक्त होणारी भीती निवारण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, अन्यथा याविरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काटे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्रकाद्वारे दिला आहे.