breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टोल नाक्यांवरील तीन मिनिटांचा नियम गुंडाळला

  • टोलसाठी पुन्हा रांगा; पैसे भरूनही मनस्ताप

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहन आल्यास तीन मिनिटांच्या आत टोल वसुलीची प्रक्रिया करण्याची तरतूद असून, त्याच्या आधारे जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पुणे- सातारा आणि त्यानंतर पुणे- नाशिक महामार्गावर टोलसाठी तीन मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागल्यास रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली होती. मात्र, सध्या त्याबाबतचा नियम गुंडाळून ठेवला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे टोलसाठी पुन्हा रांगा लागत असून, पैसे भरूनही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टोल नाक्यावर शुल्काची पावती घेऊन प्रत्येक वाहन दहा सेकंदामध्ये पुढे सरकले पाहिजे. त्याचप्रमाणे टोलसाठी रांगेत वाहन थांबल्यानंतर तीन मिनिटांच्या आत टोलची प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत तरतूद आहे. टोल वसूल करणारी कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणामध्ये झालेल्या करारांमध्येही याचा उल्लेख आहे. याच बाबींचा आधार घेत सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातारा, नाशिक रस्त्याबाबत टोल कंपन्या आणि महामार्ग प्राधिकरणाला आदेश दिले होते. त्यानुसार तीन मिनिटांत टोलची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास वाहने टोल न घेता पुढे सोडली जात होती.

सातारा आणि नाशिक रस्त्यावरच नव्हे, तर पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. अनेक वाहनधारकांना या नियमांचा लाभ मिळाला होता.सद्य:स्थितीत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. प्रामुख्याने सातारा रस्त्यावर संध्याकाळी टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. टोल भरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी जातो. त्यामुळे टोलचे पैसे देऊनही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातच या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने या त्रासात भरच पडते आहे.

टोलची प्रक्रिया पूर्ण करून तीन मिनिटांत वाहन पुढे न गेल्यास टोल न घेता रस्ता खुला करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार यापूर्वी अंमलबजावणी झाली आहे. मात्र, सध्या आदेशाचे पालन होत नसल्याने नाक्यांवर रांगा लागून प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. रांगेमुळे इंधनाचाही अपव्यय होतो. टोल कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच आदेशाची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात नसल्याचे त्यातून स्पष्ट होते आहे.   – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच अध्यक्ष

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button