breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टेमघर धरण यंदा लवकर रिकामे करणार

डिसेंबरपासून पुन्हा दुरुस्ती : शहराच्या पुरवठ्यावर परिणाम नाही

पुणे – टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला यश आल्यानंतर धरणातील गळती काही प्रमाणात कमी झाली आहे. टेमघर धरण गळतीपासून मुक्त करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केला आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरपासून धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीस सिमेंटचे अस्तरीकरण केले जाणार आहे. शहराला पिण्यासाठी आधी टेमघर धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी टेमघर धरण यंदा लवकर रिकामे करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सध्यस्थितीत टेमघर धरणाच्या दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कामामुळे धरणातील गळती कमी होण्यास मदत झाली आहे. या धरणाची पावणेचार टीएमसी एवढी क्षमता आहे. गळतीमुळे हे धरण साठ ते सत्तर टक्के भरून देण्यात येत आहे. गेल्या वर्षी या धरणात एक टीएमसी पाणीसाठा कमी करून सोडण्यात आला होता. दुरुस्तीमुळे या वर्षीही या धरणात कमी साठा ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक धरण आहे. खडकवासलाच्या दुप्पट पाणीसाठा यात होतो. मात्र, गळतीमुळे या धरणात पावसाळ्यात जमा होणारे पाणी खाली सोडावे लागते. गळतीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नव्हते. यंदा मात्र धरण 80 टक्के भरले जाणार आहे.

धरण दुरुस्तीच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील गळती पूर्णपणे बंद होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2018 नंतर या धरणाच्या आतील बाजूस सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे.

टेमघर धरणातील पाणी सोडणार

खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्याने शहरासाठी पाणी खडकवासला धरणात सोडले जाते. यावेळी पाणी सोडताना पहिले प्राधान्य टेमघर धरणाला दिले जाणार असून शहरासाठी आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडले जाणार आहे. टेमघर धरण लवकर रिकामे केले, तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button