टीम इंडियाची गोलंदाजी ‘लय भारी’, – रिकी पॉन्टींग
भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला. त्यामुळे भारताला दमदार विजय मिळाला.
भारताने या विजयासह मायदेशात सलग १२ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला. भारताच्या या यशस्वी वाटचालीत भारतीय गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले आहे. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग याची पसंती मात्र अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनाच आहे. गेल्या काही वर्षात टीम इंडियाला प्रतिभावान वेगवान आणि फिरकीपटू गोलंदाज मिळाले आहेत. पण परदेशी खेळपट्टीवर फिरकीपटूंची काहीशी तारांबळ उडताना दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या ताफ्यालाच माझी पसंती आहे, असे पॉन्टींगने म्हटले आहे.