टीम इंडियाकडून पाकिस्तानला 337 धावांचे आव्हान
मॅंचेस्टर, – ICC Cricket World Cupमध्ये सुरु असलेल्या हायवोल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला धावांचे 337 आव्हान दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 336 धावा केल्या.
भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. तर, त्यानंतर विराटनं 77 धावांची खेळी केली.
पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा फटका त्यांना बसला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित बाद झाला. त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.
ऑस्ट्रेलिया विरोधातही हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्यानं 48 धावांची तुफान खेळी केली होती. मात्र, या सामन्यात पांड्या केवळ 26 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे कोहलीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानला त्यांचा हा निर्णय महागात पडत आहे. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र केदार जाधव आणि विजय शंकर यांनी 22 धावा केल्या.