झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्यावर रवीनाने व्यक्त केला संताप
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या हिट चित्रपटातून अगदी कमी वयामध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे झायरा वसीम. झायरा लवकरच सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा व फरहान अख्तरसह झळकणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच झायराने सोशल मीडियावर ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते’ असे लिहित बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीनाने देखील तिचा राग व्यक्त केला आहे.
रवीनाने झायराच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रवीना तिचा राग व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये एक-दोन चित्रपटच केले आहेत, जे कलाविश्वाबद्दल दोन चांगले शब्द बोलू शकत नसतील तर अशांनी या कलाविश्वातून बाहेर पडले तरी काही फरक पडत नाही असे रवीना म्हणाली. अशा व्यक्तींनी या कलाविश्वातून अभिमानाने बाहेर पडावे आणि त्यांनी त्यांचे विचार त्यांच्यापूरतेच मर्यादित ठेवावेत अशा प्रकारे रवीनाने तिचा संताप व्यक्त केला आहे.
झायराने ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झाले. आमिर खानने अनेकदा तिच्या अभिनयकौशल्याची स्तुती केली आहे. अभिनयातील इतके चांगले करिअर पुढे असतानाही तिने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराला पाठिंबा दिला आहे.