जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये सुरक्षादलाकडून ४ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू – जम्मू जिल्ह्याच्या नगरोटा भागात दहशतवादविरोधी अभियानात सुरक्षादलांना मोठे यश आले आहे. आज पहाटे पाच वाजता झालेल्या चकमकीच ४ दहशतवादी ठार झाले आहेत. हे चारही दहशतवादी ट्रकमध्ये लपले होते, असा दावा लष्कराने केला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारावर सुरक्षादलांनी बन टोल नाक्याजवळ एक तपासणी नाका लावला होता. दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वाहने तपासत असताना ट्र्कमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यांना चोख प्रत्युत्तर देत सुरक्षादलांनी तो ट्र्कच उडवला. त्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या कारवाईत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीनंतर उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. अभियान अजूनही सुरू आहे. आतापर्यंत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.