ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी घंटानाद
पुणे – ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी सुसज्ज स्मारक उभारण्याच्या घोषणेचा पुणे महापालिकेला विसर पडला आहे. केवळ कागदावर राहिलेली घोषणा प्रत्यक्षात उतरावी आणि स्मारकाला मूर्त स्वरुप प्राप्त व्हावे, ही मागणी पुणेकर रसिकांकडून प्राधान्याने केली जात आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला. ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक झालेच पाहिजे, अशी मागणी करणारी पत्रके सर्वांच्या हातामध्ये होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संवादचे सुनील महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे, गदिमांचा नातू सुमित्र माडगूळकर, पणती पलोमा माडगूळकर, राजा महाजन, प्रवीण वाळिंबे, उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, नंदकुमार काकिर्डे, भाग्यश्री देसाई, मोहन कुलकर्णी, हेमंत मावळे, संतोष चोरडिया, प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते.