गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या: मनमोहन
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत,’ असा घणाघाती आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मनमोहन सिंग आज मुंबईत आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी आज पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मनमोहन यांनी यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवर सडकून टीका केली. ‘काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळं आणि आर्थिक मंदीमुळं देशाचं भविष्यच अंधारात गेलंय. दरवाढीवर नियंत्रण राखण्याच्या हट्टाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आयात-निर्यात धोरणालाही झळ बसली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असून महाराष्ट्र याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असं मनमोहन म्हणाले.
‘देशाचे ‘ऑटो हब’ असलेल्या पुण्यावरही मंदीचं मळभ दाटलं आहे. देशातील व महाराष्ट्रातील आर्थिक संकटावर उपाय शोधण्यात केंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. प्रत्येक समस्येसाठी विरोधकांना दोष देणं एवढाच उद्योग सरकार करत आहे,’ असं मनमोहन यांनी सांगितलं. ‘२०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक वृद्धीचा दर १०-१२ टक्के असायला पाहिजे,’ याचा पुनरुच्चारही सिंग यांनी यावेळी केला.