खाजगी वाहन घेऊन जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास घेवूनच जिल्ह्यात मिळणार प्रवेश
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची एसटी बस साठी लागणाऱ्या ई-पासची काळजी मिटली असली तरी खाजगी वाहन घेऊन जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र ई-पासची आवश्यकता असणार आहे. एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नसणार आहे मात्र इतर खासगी वाहनांना व अन्य मार्गांनी येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास घेवूनच जिल्ह्यात यावं लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, १० दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीची अंमलबजावणी शासनाच्या गाइडलाइन्स हाती आल्यानंतरच केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनानं गणेशोत्सवाबाबत धोरणे ठरवली असून याबाबत शासन निर्णयही निघाला आहे. कशेडी घाटात एसटीला थांबविले जाणार नाही. कशेडी घाटात गर्दी होते व लोकांची गैरसोय होते त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. दापोली-मंडणगडसाठी स्वतंत्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र रूट करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर स्क्रीनिंग सेंटरची क्षमता वाढविण्यात येणार आहे. ज्या चाकरमान्यांमध्ये कोविडची लक्षणे असतील वा काही आजार असतील त्यांची सक्तीने अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार असून त्यासाठी १५ हजार अँटिजेन टेस्ट किट मागवली आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या कोविड तपासणीसाठी जी यंत्रणा आहे त्याची क्षमता दुप्पट करण्यात येणार आहे. होम क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांचा करण्यात आला आहे. त्याबाबत गाइडलाइन्स आल्या की अंमलबजावणी केली जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. होम क्वारंटाइन होणाऱ्या लोकांना बाहेर फिरण्यास मनाई असेल. त्यांना गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. सार्वजनिक आरती, भजनामध्येही ते सहभागी होऊ शकणार नाहीत, असे मिश्रा यांनी सांगितले.
सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा झाली आहेत. त्यातील हायरिस्क असलेले सदस्य वगळून बाकी सदस्यांची कोविडसाठी ड्युटी लावणार आहोत. तसेच ग्रामीण भागातही डॉक्टर व नर्सेस पाठवले जाणार आहेत. लवकरात लवकर महिला रुग्णालय कोविड रुग्णालयात रुपांतरित करण्यात येणार असून त्या ठिकाणी १०० बेडची सुविधा होणार आहे. कामथे व कळंबणी येथेही क्षमता वाढविली जाणार आहे. चतुर्थश्रेणी कामगारांवर ताण येत असल्याने अनेक ठिकाणी स्वच्छतेसाठी मशिन्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये व्हॅक्युम क्लीनर व अन्य मशीन्स असतील. त्यामुळे कमी कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होवू शकणार आहे.