कोल्हापुरच्या राही सरनोबतने पटकावले आशियाई स्पर्धेत सुवर्ण
जकार्ता : इंडोनेशियातील जकार्ता येथे होत असलेल्या आशियाई स्पर्धा 2018 मध्ये पिस्तूल नेमबाजीमध्ये राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत.
आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम राहिले आहे. 25 मीटर पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबतने सुर्वण पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी 2014च्या आशियाई स्पर्धेत तिने ब्राँझ पदक कमावले होते.
सुरवातीपासूनत सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले पहिले स्थान कायम ठेवले होते. मात्र, शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या नफास्वान यांगपायबून यांच्यात शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोघींचे 4 – 4 गुण झाल्यामुळे दुसरा शूटऑफ सामना खेळवण्यात आला. या शूटऑफमध्ये राहीने 3 – 2 ने बाजी मारत सुवर्णपदक आपले नाव कोरले तर कोरियाची मिनजुंग किम हि ब्रॉंझ पदकाची मानकरी ठरली. पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावणारी मनू भाकर हिला मात्र सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.