कॉलर ट्यून लावून भीती निर्माण केली जातेय, यामागे काय कटकारस्थान आहे – प्रकाश आंबेडकर
सोलापूर | गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान देशभरात तीन महिन्यांपासून मोबाइलवर कोविड संदर्भात माहिती देणारी कॉलर ट्यून लावण्यात आली आहे. आता यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. कॉलर ट्यून लावून भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केले असल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाने एकलकोंडी जीवनास सुरुवात केली असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते. टीबीच्या वेळी लॉकडाऊन करण्यात आलं नव्हतं. मात्र आता कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अनेक जणांना उपाशी राहावं लागलं. अनेकांचा रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जातेय. 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.