कैलास मानससरोवर यात्रेकरूंची सुखरूप सुटका
काठमांडू – कैलास मानससरोवर यात्रेहून परतणारे 1430 भारतीय यात्रेकरू खराब हवामानामुळे नेपाळच्या पर्वतराजीच्या भागात अडकून पडले होते त्या सर्वांची आता विमानाने सुखरूप सुटका करण्यात आली असून तेथील 160 यात्रेकरूंची शेवटची तुकडी विमानाने हलवण्यात आल्याची महिती नेपाळ मधील भारतीय दूतावासाने दिली आहे. हिलसा आणि सिमीकोट जिल्ह्यात हे यात्रेकरू अडकले होते त्यांना तेथून नेपालगंज आणि सुरखेत येथे हलवण्यात आले आहे. हा भाग भारतीय सीमेनजिक असून त्यांना तेथे अधिक चांगल्या आरोग्य व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भारतीय दूतावासाचे एक पथक या यात्रेकरूंच्या सुटकेच्या कामावर देखरेख ठेऊन होते. आज 160 यात्रेकरूंची शेवटची तुकडी तेथून हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ही प्रक्रिया आता पुर्ण झाली आहे असे त्यांनी सांगितले.गेले पाच ते सहा दिवस हे यात्रेकरू तेथे अडकून पडले होते.
पश्चिम नेपाळ मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे तेथील सर्व संपर्क तुटले होते व वाहतूकही पुर्णपणे थंडावली होती. त्यामुळे यात्रेकरूंना कोठेच हालता येत नव्हते. नेपाळी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा तसेच प्रवासी विमानांचा त्यासाठी वापर केला गेला. या यात्रेकरूंना त्यांच्या भारतातील नातेवाईकांना संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना औषधे आणि आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी नेपाळ मधील टूर ऑपरेटर आणि नेपाळ लष्कराच्या मदतीने हे सुटकेचे अभियान राबवले.