काळानुरूप राज्यघटनेतील तरतुदींची दुरुस्ती होणे साहजिकच: जे. साई दीपक
नागपूर : घटनाकारांनी संविधान लिहितांना राज्यकारभार सुव्यवस्थित चालावा यासाठी तत्कालिन परिस्थिती लक्षात घेतली होती. त्यावेळी कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि प्रशासकीय मंडळांचे कार्य काय असावे, हे त्यात नमूद केले होते. परंतु, आतापर्यंत बदलेला काळ आणि बदलत जाणारी परिस्थिती बघता वारंवार घटनेतील काही तरतुदींमध्ये दुरुस्ती करावी लागली. त्यामुळे सध्याच्या स्थितीत काही तरतुदींमध्ये दुरुस्ती होणे साहजिकच आहे, असे प्रतिपादन जे. साई दीपक यांनी केले. ते आज ‘आयएमए’ सभागृहात मंथन संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
जे. साई दीपक म्हणाले की, राष्ट्रभक्तीसाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही. राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तात असली पाहिजे. देशातील संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने जीव लावून झटले पाहिजे. हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी इतिहास आणि संस्कृती जपण्याची गरज आहे. इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळविल्यानंतर भारताला एकसंघ करण्यासाठी तसेच राजेशाही नष्ट होऊन लोकशाही आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीतून संविधान निर्माण करण्यात आले. त्यातून देशात सुव्यवस्था व शांतता नांदेल याची तरतुद करण्यात आली होती. काळानुरूप घटनेतील काही तरतुदींमध्ये बदल किंवा दुरुस्त्या करण्यात आल्या.
भविष्यातही परिस्थिती बदली तर तरतुदींमध्ये बदल करावा लागणे स्वाभाविक आहे. आता देशात मुलांना नितीमूल्य, संस्कृती, इतिहास, धर्मिक ज्ञान देणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक राजकीय नेता भ्रष्टाचारी नाही. परंतु, जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या कृत्यामुळे देश पोखरत जात आहे. अनेक जण देशभक्ती फक्त प्रसारमाध्यमांवरूनच दाखवतात. जे प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाते, त्यावरच लोकांचा विश्वास बसतो, असेही साई दीपक म्हणाले.