कांदिवली आग विझवल्यानंतर आढळले चार मृतदेह, शोधमोहिम अद्याप सुरूच
मुंबईच्या अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मुंबईत सुरू झालेले आगीचे सत्र अद्याप कायम आहे. कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही येथे शोधमोहिम सुरू आहे.
दुपारी चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर चार फायर इंजिन आणि चार जंबो वॉटर टँकर्सच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास पूर्णपणे ताबा मिळवण्यात यश आलं. आग विझवल्यानंतर शोधमोहिम सुरू असताना चार जणांचे मृतदेह आढळले. राजू विश्वकर्मा (पु/वय 30 वर्ष), राजेश विश्वकर्मा (पु/वय 36 वर्ष), भावेश पारेख (पु/वय 51 वर्ष), सुदामा लल्लनसिंग (पु/वय 36 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. मृत्यूमुखी पडलेले कारखान्यातील कामगार असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय, खार पश्चिम येथील राजस्थान हॉटेलजवळ असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरही रविवारी सकाळी आग लागली होती. आठ फायर इंजिन आणि टँकर्सच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तळमजल्यावर असलेल्या न्यू ब्युटी सलूनला ही आग लागली होती.