कर्नाटकात लोकसभा निवडणुकीनंतरच भाजपाचे ‘ऑपरेशन कमळ’ ?
लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये भाजपा सत्तास्थापनेसाठी हालचाली करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. सत्ताधारी पक्षांमधील आमदारांनी उघडपणे बंड केल्यावरच पुढील हालचाली सुरु केल्या जातील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये वेगाने राजकीय घडामोडी सुरू असून सत्ताधारी पक्षातील काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. भाजपामधील एका नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमध्ये सत्ता बदल करण्यास भाजपातील पक्षश्रेष्ठी अनुकूल नाहीत. याऊलट लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- जनता दल सेक्यूलर या आघाडीवर टीका केल्यास भाजपालाच फायदा होईल, असे देखील पक्षनेतृत्वाला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षातील आमदार फोडण्यासंदर्भात पक्षनेतृत्वाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. असे प्रयत्न केल्यास लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, याची जाणीव पक्षनेतृत्वाला असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.
भाजपाचे कर्नाटकमधील महासचिव पी. मुरलीधर राव यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सध्या पक्षाची भूमिका ‘वेट अँड वॉच’ची आहे. आमच्याकडून सत्तास्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस- जेडीएस आघाडीचे सरकार कायम राहील, ही जबाबदारी आमची नाही, असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उघडपणे बंड केल्यास पुढील विचार केला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने बोलावली बैठक
काँग्रेसने १८ जानेवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पडू नये म्हणून काँग्रसच्या काही मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. पक्षनेतृत्व पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आमदारांची फोडाफोडी करून भाजपा कुमारस्वामी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. राज्यावरचे संकट लवकरच दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केला. तर सत्तारूढ आघाडी भक्कम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.