“कमलनाथ सरकार म्हणजे, ‘रणछोडदास’; त्यांना कोरोना सुद्धा वाचू शकणार नाही”
भोपाळ | महाईन्यूज
मध्य प्रदेशकाँग्रेसच्या कमलनाथ सरकारची आज होणारी बहुमत चाचणी टळल्यानंतर, मध्य प्रदेशातील भाजप आमदारांनी आज राजभवनात गव्हर्नर लालजी टंडन यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांना लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी विनंती केली. तर यावेळी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी बोलताना कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले की, कमलनाथ यांच्या सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे राज्यपालांनी फ्लोर टेस्ट लवकरात लवकर घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. परंतु मुख्यमंत्री यातून पळ काढत आहे. त्यामुळे राज्यपालांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तर कमलनाथ सरकार रणछोडदास झाले असून, त्यांना कोरोना व्हायरस सुद्धा वाचू शकणार नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. तर आज होणारी कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होऊ न शकल्याने, शिवराज सिंह चौहान यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर बहुमत चाचणीचे संकट ओढवले आहे.