एनआरसीवरून सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
- गृहमंत्री राजनाथसिंह यांचा राज्यसभेत आरोप
नवी दिल्ली – आसाम सरकारच्या एनआरसी म्हणजेच अधिकृत नागरीकांच्या नोंदणी रजिस्टरच्या विषयावरून निर्माण झालेल्या वादाच्या संबंधात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत निवेदन केले. ते म्हणाले की काही जण यानिमीत्ताने समाजात भीती निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करीत आहेत. एनआरसीची ही यादी अंतिम नाहीं. ज्यांचे नाव यातून वगळण्यात आले आहे त्यांना आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची पुन्हा एक संधी दिली जाईल. या यादीला अंतिम स्वरूप देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आसामात कोठेही हिंसक प्रकार घडू नयेत म्हणून राज्य सरकारच्या विनंतीवरून तेथे जादा सुरक्षा दले पाठवण्यात आली आहेत. यावेळी राजनाथसिंह यांनी या यादीच्या संबंधातील पार्श्वभूमीही थोडक्यात विशद केली. ते म्हणाले की आसामातील नागरीकांची छाननी झाली पाहिजे अशी मागणी त्या संबंधात झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीत झाली होती. त्यामुळे या छाननीच्या हेतुविषयी कोणाला शंका घेता येणार नाही. पण त्यात ज्या काही तृटी असतील त्याचे निराकरण केले जाईल.
बेकायदा ठरलेल्या नागरीकांचे काय करणार?
यावेळी अनेक सदस्यांनी एनआरसी संबंधात आपले आक्षेप सभागृहात नोंदवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीद मेमन म्हणाले की या यादीच्या संबंधात पारदर्शकता बाळगली जाईल आणि सर्वांनाच आपले नागरीकत्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिली जाईल असे जे विधान गृहमंत्र्यांनी केले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. पण तरीही या फेरतपासणीनंतर बेकायदेशीर ठरलेल्या नागरीकांची जी अंतिम यादी प्रकाशित होईल त्याविषयी आपण नेमके काय करणार आहोत हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे.
कारण आम्ही भारतात बेकायदेशीर ठरलेल्या कोणत्याही नागरीकाला आमच्या देशात परत घेणार नाही असे बांगला देश सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नागरीकांचे भारत सरकार काय करणार आहे हे सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे.