एकाच धाग्यातून साकारला तिरंगा, स्वप्नपूर्तीसाठी त्यानं विकलं घर!
कोणत्याही शिवणकामाशिवाय तसेच कापडाच्या जोडणीशिवाय एकाच धाग्यातून भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्यात आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने यश मिळवले आहे. आजवर कुणीही न केलेले हे काम करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या व्यक्तीला मात्र अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागला, यासाठी त्याला आपले वडिलोपार्जित घरही विकावे लागले.
आर. सत्यनारायण असे या हातमाग कारागिराचे नाव असून एकाच धाग्यात तिरंगा बनवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला साडे सहा लाख रुपयांची गरज भासणार होती. काहीही करुन हे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याने चंगच बांधला, त्यासाठी त्याने आपले वडिलोपार्जित घर विकून टाकले आणि पैसे जमवले.
सत्यनारायणने ८ फूट बाय १२ फूट या आकारात तिरंगा साकारण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याचा दावा आहे की, अशा प्रकारे केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगासह निळ्या रंगातील अशोक चक्र असा तिरंगा खादीच्या एकाच धाग्यांपासून आजवर तयार करण्यात आलेला नाही. तिरंगा तयार करताना तिनही रंगांचे भाग निश्चित मापांमध्ये जोडूनच किंबहुना शिवूनच ते तयार केले जातात.
दरम्यान, आता हा अनोखा राष्ट्रध्वज तयार झाल्यानंतर सत्यनारायणने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे स्पप्न बाळगले आहे ते म्हणजे हा ध्वज त्याला दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पहायचे आहे. या किल्ल्यावर देशाचे पतंप्रधान स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करतात. त्यासाठी आंध्र प्रदेशातील वेमावरम गावातील या कारागीराने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ते नुकतेच विशाखापट्टणमच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी भेट घेतली आणि त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, आपल्या या विशिष्ट कामाची माहिती पंतप्रधानांना विस्ताराने सांगण्यास त्याला पुरेसा वेळच मिळाला नाही.
हा अनोखा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी नारायण यांना आपले वडिलोपार्जित घर विकावे लागले. त्यानंतर आलेल्या पैशातून ध्वजाचे विणकाम करण्यासाठी त्यांना चार वर्षांचा कालावधी लागला. अशा वेगळ्या पद्धतीने राष्ट्रध्वज तयार करण्यात आवड कशी निर्माण झाली या प्रश्नाला उत्तर देताना नारायण म्हणाले, मी लिटल इंडिअन्स नावाचा एक लघुपट पाहिला होता यामध्ये त्यातील कलाकार एकत्रीतपणे शिवणकामाद्वारे तीन रंगाचा राष्ट्रध्वज तयार करतात. त्यातूनच प्रेऱणा घेत अनोख्या पद्धतीने कोणतेही शिवणकाम न करता राष्ट्रध्वज साकारायचे मी निश्चित केले होते.