एकनाथ खडसे यांना लवकरच न्याय मिळेल: चंद्रकांत पाटील
जळगाव- राज्यात भाजपचे सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावरील अन्याय लवकरच संपणार असून त्यांना योग्य न्याय मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचार प्रकरणातून क्लिन चिट देवूनही त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात कोठळीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यामध्ये भाजपचे सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे श्रम आहेत. अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. एकनाथ खडसेंवरील अन्यायही संपेल आणि त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यावर एकनाथ खडसे म्हणाले, आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नाही. याप्रसंनी त्यांनी दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचा आधार घेतला आणि आपल्यामागे जनता असल्याचे सांगत पुन्हा एकदा सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला.
माझ्या झालेले आरोप हे पूर्णपणे खोटे असल्याचे चौकशीनंतर सिद्ध झाले आहे. तसेच चौकशी समितीने क्लिन चिटही दिली. मात्र सरकार असे म्हणायला तयार नाही. त्यामुळे वाढदिवशी आपण एक संकल्प केला आहे. आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत. तसेच जनतेने सांगितले की तुम्ही दोषी आहात, तर राजकारण सोडून देईन, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला.