एअर इंडियाने 4 मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याचे दिले संकेत
सरकारी विमान सेवा कंपनी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर १ जून पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यासही एअर इंडिया सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाउन ३ मे ला संपुष्टात येणार आहे. लॉकडाउनचा कालावधी संपण्यापूर्वी एअर इंडियाने ठराविक मार्गावरील देशांतर्गत तिकीट आरक्षण खिडकी खुली केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत करण्यात आलेली घोषणा १९ दिवसांनी वाढवत देशव्यापी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. दरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमान सेवा ठप्प झाली आहे. 3 एप्रिलला एअर इंडियाने महिन्याच्या अखेरपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट बुकींग स्थगित केल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर शनिवार एअर इंडियाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात एअर इंडियाने म्हटलंय की, कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ३ मे पर्यंत देशांतर्गत आणि ३१ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय निर्णय घेतला होता. परिणामी याकाळात बुकींगही स्थगित करण्यात आले होते. ४ मे पासून ठराविक मार्गावरील देशांतर्गत तिकीट बुकींग तसेच १ जून २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट बुकींग सुरु करण्यात येत आहे.
एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मेट्रो शहरांना जोडणारी विमान सेवा सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येईल. परिस्थिती पाहून इतर मार्गावरील सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. उड्डानादरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयही (डीजीसीए) (डीजीसीए) आणि आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केले करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.