उत्तर भारतात पुराचा कहर, आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजवला आहे. आसाममध्ये आलेल्या पूरात आतापर्यंत 84 जणांच्या मृत्यू झालाय. आसाममधील 33 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांच्या 25.30 लाख नागरिकांवर या पुराचा परिणाम झाला आहे. बिहारमध्ये देखील मुसळधार पावसात वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिल्लीतही पुराची स्थिती तयार झाली, तर उत्तराखंडमध्येही पूल पडल्याची घटना घडली आहे.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आसाममधील पुराची आणि कोरोनाच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना फोन केला. त्यांनी बागजान येथील तेलाच्या विहिरीत लागलेल्या आगीच्या घटनेचीही माहिती घेतली. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विट केलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन आपली चिंता व्यक्त केली आणि नागरिकांसोबत एकजूटता दाखवली. पंतप्रधान मोदींनी आसामला सर्वोतपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं.”
मुख्यमंत्री सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींना पुरामुळे राज्यातील 24 जिल्हे प्रभावित झाल्याची माहिती दिली. तसेच राज्य सरकारने पुरग्रस्तांसाठी मदत शिबीरं सुरु केल्याचं सांगत तेथे कोविड-19 चे सर्व नियम पाळले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दिल्लीतील रस्ते पाण्याखाली
दिल्लीतही रविवारी (19 जुलै) सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी तर अगदी पुरस्थिती तयार झाली. दिल्लीतील जवळपास सर्वच भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागला. या पावसाचा सर्वाधिक फटका नवी दिल्लीला बसला. नवी दिल्लीतील मिंटो ब्रिजखाली तर पाण्यात बुडाल्याने एका टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.
बिहारमध्ये वीज पडून 10 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये विविध ठिकाणी वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये रविवारी पूर्णिया जिल्ह्यात 3, बेगूसरायमध्ये 2, पटना, सहरसा, पूर्व चंम्पारन, मधेपुरा आणि दरभंगात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला.