इम्रान पंतप्रधान झाल्यास भारताने युद्धसज्ज राहावे – स्वामी
नवी दिल्ली – पाकिस्तानी लष्कराचे समर्थन असणारा माजी क्रिकेटपटू-नेता इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान झाल्यास भारताने युद्धसज्ज राहावे असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी स्वामी यांनी म्हटले आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्याने पाकिस्तान भारताबरोबर युद्ध सुरू करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान भारताबरोबर युद्ध सुरू करील असे गृहित धरून आपण सज्ज राहिले पाहिजे. पाकिस्तानबरोबर युद्ध झाल्यास ती संधी घेऊन पाकिस्तानचा खातमा करून त्याचे चार तुकडे केले पाहिजेत असे त्यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील पीटीआय पक्ष निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
इमरान खान हा पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुले असल्याचे सांगून स्वामी पुढे म्हणाले, की ते सर्व (पंतप्रधान) आयएसआय, लष्कर आणि तालिबान यांच्या हातातील बाहुलीच असतात. बाहुले असूनही बाहुले नसल्याचा आव आणणाऱ्या नवाज शरीफ यांच्यापेक्षा ते बरे. एका नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्ता हस्तांतरित होण्याची गेल्या 70 वर्षातील ही केवळ दुसरी वेळ आहे. दहशतवाद्यांसह 122 पक्षांनी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते.