आषाढी वारीतील पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे भेटवस्तूची परंपरा खंडीत ?
पिंपरी – श्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरविणा-या पिंपरी चिंचवड महापालिकेकडून यंदा आषाढी वारीतील दिंडीकरांना देण्यात येणारी भेटवस्तूची परंपरा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून एकमेकांवर झडणा-या आरोप-प्रत्यारोपांची फैरीला लगाम बसणार आहे. त्यामुळे विनाकारण टार्गेट होणा-या प्रशासनातील अधिका-यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आषाढीवारी पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. 5 व 6 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यापैकी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आकुर्डीत एक दिवसाचा मुक्काम असतो. या वारीकाळात पिंपरी-चिंचवडकर वारकऱ्यांची मोठ्या मनोभावे सेवा करतात.
जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीतील सहभागी दिंडीकरांना कित्येक वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध स्वरुपात भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात येत होता. महापालिकेत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली, तरी देखील गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. याकरिता पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च केले जातात. यावेळी भाजपकडून वारीतील दिंड्यांना यंदा तंबु भेट देण्याच्या विचाराधिन असल्याचे महापाैर नितीन काळजे यांनी सांगितले होते.
मागील दोन वर्षापुर्वी तत्कालीन सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकाळात विठ्ठल-रुक्मृिणी मुर्ती खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप विद्यमान सत्ताधारी असलेल्या भाजपकडून करण्यात आला. एेनवेळी निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या आरोपामूळे राष्ट्रवादीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. भाजपकडून गतवर्षी वारक-यांना ताडपत्री भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. त्या ताडपत्री खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅग्रेसने केला. त्यामुळे मागील दोन वर्षात विठ्ठल-रुक्मिृणी मूर्ती आणि ताडपत्री खरेदीत घोटाळावरुन राज्यभरात आषाढीवारी सोहळ्याला गालबोट लागले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन चिखलफेक करण्यात आली. त्यामुळे महापालिका प्रशासनातील अधिका-यांनाही धारेवर धरुन चाैकशीला सामाेरे जावे लागले.
दरम्यान, आषाढी वारीत दोन्ही पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून तंबू देण्याचे पत्र महापाैर नितीन काळजे यांनी 20 जून रोजी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकरांना दिले. तसेच वारक-यांना कोणती वस्तू द्यायची यावर गटनेत्यांना विचारात घेवून निर्णय घेण्याचे म्हटले होते. परंतू, महापाैरांनी दिलेले पत्र जनसंपर्क विभागाकडून भेटवस्तू खरेदीसाठी अद्याप भांडार विभागाकडे आलेले नाही. त्यामुळे भेटवस्तूची परंपरा यावर्षीपासून खंडीत होणार आहे. मात्र, यंदा शासनाच्या आदेशामुळे महापालिकेकडून कोणतीही भेटवस्तू देता येणार नाही, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.
भेटवस्तूवरुन पुन्हा वाद उद्भवू नये, आरोप-प्रत्यारोपांने आषाढी वारीला गालबोट लागू नये, म्हणून यंदा वारक-यांना पाणी, स्वच्छतागृह अशा विविध नागरी सुविधा मुबलक प्रमाणात पुरविण्याच्या येणार आहेत.
एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेता, पिंपरी-चिंचवड.