आशियाई तिरंदाजी स्पर्धा : भारताला तीन कांस्यपदके
आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक रीकव्र्ह प्रकारात भारताच्या अतानू दाससह तीन खेळाडूंनी मंगळवारी कांस्यपदके जिंकली. याचप्रमाणे किमान तीन रौप्यपदकांची निश्चिती केली.
भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घालण्यात आल्यामुळे अतानू हा त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाला होता. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने कोरियाच्या जिन हायेक ओहचा ६-५ असा पराभव केला. मग दासने तरुणदीप राय आणि जयंत तालुकदार यांच्या साथीने पुरुष सांघिक गटात चीनचा ६-२ असा पराभव करून दुसरे कांस्यपदक पटकावले. त्यानंतर, महिलांच्या रीकव्र्ह सांघिक गटात दीपिका कुमारी, लैश्राम बोम्बायला देवी आणि अंकिता भाकट यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा ५-१ असा पराभव केला.
सोमवारी अतानूने रीकव्र्ह मिश्र सांघिक स्पर्धेत दीपिका कुमारीच्या साथीने कांस्यपदक पटकावले होते. अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांचा समावेश असलेला भारतीय कंपाऊंड मिश्र सांघिक संघ बुधवारी अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या जोडीचा सामना करणार आहे.