चिखली घरकुल परिसरातील पाणी समस्या मार्गी लावा : निलेश नेवाळे
– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
चिखली घरकूल परिसरातील पाणी समस्या मार्गी लावावी. तसेच, अतिरिक्त व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली घरकुल परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी समस्या उद्भवली आहे. स्थानिक नागरिकांना कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही सोयटींमधील नागरिकांनी पाणी जास्तवेळ पुरवठा केल्यास पुरेसा साठा करता येईल, असे गाऱ्हाणे मांडले आहे.
उन्हाळा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात पाणी टंचाई सदृश्य परि.स्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे.
याबाबत महापालिका पाणी पुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घ्यावी. तसेच, परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी आमची मागणी आहे. चिखली आणि घरकुल परिसरात सुमारे २५ हजार लोकवस्ती आहे. अत्यंत महत्त्वाचा असलेला पाणी प्रश्न प्रशासनाने तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणीही निलेश नेवाळे यांनी केली आहे.