अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई – रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरिम जामीन नाकारला असून उच्च न्यायालयाच्या या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब यांना दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आमच्या विशेष अधिकारात अर्णब यांना तातडीचा अंतरिम जामीन मंजूर करण्यासारखे हे प्रकरण नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या वकिलाने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून सर्वोच्च न्यायालयातही अर्ज केला आहे. त्यामुळे त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.