अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने पत्नीला तंदूरमध्ये टाकून जाळलेलं!
नवी दिल्ली | २ जुलै १९९५ रोजी रात्री एका रेस्टॉरंटमध्ये भयंकर आग लागली होती. पण एवढ्या रात्री या रेस्टॉरंटमध्ये अन्न शिजवले जात नव्हते, तर एका महिलेचा मृतदेह तंदूरमध्ये जाळला जात होता. भारताच्या इतिहासातील ही अशी घटना होती की, जिने केवळ राजधानी दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश हादरवून टाकला होता. वर्तमानपत्र आणि रेडिओमध्ये या प्रकरणाची व्यापक चर्चा झाली. तथापि, खटला सुरु होण्यास फार वेळ लागला नाही. लवकरच पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. जाणून घ्या ही धक्कादायक घटना नेमकी काय होती:
२ जुलै १९९५ रोजी रात्री ८:३० वाजता गोल मार्केटच्या सरकारी फ्लॅट नंबर 8/2 ए मध्ये युवा कॉंग्रेसचे माजी नेते सुशील यांनी आपली पत्नी नैना हिला फोनवर कुणाशी तरी बोलत असल्याचं पाहिलं. सुशीलला पाहताच नैनाने फोन कट केला. सुशीलने जेव्हा तोच नंबर रिडायल केला तेव्हा दुसऱ्या बाजूला त्याचा वर्गमित्र करीम मतबूल हा होता. यामुळे सुशील प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात कोणतंही सत्य जाणून न घेता त्याने आपल्या रिव्हॉल्व्हरने थेट नयनावर गोळीबार केला. या गोळीबारात नैनाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर, सुशीलला नैनाचा मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत काहीही सुचत नव्हतं. मात्र नंतर त्याने स्वत:च्या बागिया या रेस्टॉरंटमधील तंदूरमध्ये मृतदेह जाळण्याची योजना आखली. रात्री साधारण एक वाजला होता. सर्व रस्ते निर्जन झाले होते. आजूबाजूच्या घरात लोक शांततेत झोपले होते. त्याचवेळी कनॉट प्लेसमधील अशोक यात्री निवास हॉटेल येथील बागिया रेस्टॉरंटमध्ये तंदूरच्या आत नैनाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
सुशीलने नैनाचा मृतदेह रेस्टॉरंटमध्ये नेऊन तंदूरमध्ये टाकून त्याला आग लावली. नयनाचा मृतदेह जाळण्यासाठी त्याने आपल्या मॅनेजरला बटर आणण्यासाठी पाठवलं होतं. जेणेकरून तिचं शरीर सहजपणे जळू शकेल. मृतदेह तंदूरमध्ये टाकण्यासाठी त्याने चाकूने मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. जेव्हा रेस्टॉरंटमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसल्या तेव्हा तेथील जवळच्या फुटपाथवर झोपलेली भाजी विक्रेती अनारो ही जोरजोरात ओरडू लागली. अनारोचा आरडाओरड ऐकून जवळच गस्त घालणारे दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल अब्दुल नजीर गुंजू हे रेस्टॉरंटजवळ आले आणि या प्रकरणातील सत्य समोर आलं.
जेव्हा पोलिस तिथे पोहोचले तेव्हा नैनाचा मृतदेह पूर्णत: जळून गेला होता. आगीच्या उष्णतेमुळे नैनाच्या आतड्या पोटातून बाहेर आल्या होत्या. पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला पकडले होते. या प्रकरणात सुशीलला तुरूंगात टाकण्यात आले होते. डिसेंबर २०१८ मध्ये सुशीलला २३ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरूंगात राहिल्यानंतर त्याला सोडण्यात आलं होतं.