अजित पवार परत येऊ शकतात, भाजपाने त्यांना ‘ब्लॅकमेल’ केलं; संजय राऊत ‘प्रचंड आशावादी’
मुंबई – राज्यातील राजकारणात मोठी भूकंप झाला आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी रात्री उशिरा भाजपासोबत हातमिळवणी करुन सत्तेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत ८ आमदार शपथविधीला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शपथ दिली. मात्र या संपूर्ण नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात उभी फूट पडल्याचं दिसून आलं.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी ७ वाजता हे पाप भाजपाने केलं. अजित पवारांसोबत गेलेले ८ आमदारांपैकी ५ आमदार पुन्हा परतले आहेत. त्यांना खोटं सांगण्यात आलं. गाडीत बसवून अपहरण केल्यासारखं वागविलं. जर भाजपात हिंमत असेल तर विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवावं असं आवाहन संजय राऊतांनी दिलं आहे.