अजितदादा पुन्हा भाजपसोबत जाणार?, ‘या’ राष्ट्रीय नेत्यांचा दावा
पिंपरी |महाईन्यूज|
‘अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असतात. या सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा दावा करत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राजकारण खळबळ उडवून दिली आहे.
रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. ‘परवा मुख्यमंत्री मला म्हणाले की, आठवलेजी आता तुम्ही इकडे या. पण मी म्हणालो तुम्हीच इकडे या,’ असं म्हणत आठवले यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकवला.
‘राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,’ अशी भूमिका मराठा आरक्षणप्रश्नी रामदास आठवले यांनी घेतली.
देशात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा या जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची सूचना वारंवार केली जात होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांसह हातात मेणबत्ती घेऊन ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या. कोरोना देशातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही या घोषणा दिल्या असल्याचा युक्तिवाद त्यांनी त्यावेळेस केला होता.