अखेरचे ३० मिनिट काय घडलं? रडले, जमिनीवर लोळले, तडफडले…फाशीच्या अर्ध्या तासापूर्वी तिहारमध्ये काय झालं?
सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला, २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला. पण, अखेर सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आणि मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आले.
तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. यातील एक खटका (लीवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, तर दुसरा जेलच्या स्टाफने. त्यापूर्वी पहाटे 3.15 वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेवून जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळून राहिला…त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्यावेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींच्या गळ्याभोवतीचा फास आवळला.