अंमली पदार्थांचा दुरुपयोग रोखण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली – मद्य आणि अंमली पदार्थांचा दुरुपयोग रोखण्यासाठीच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्यांचा आज, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दुरुपयोग आणि तस्करी प्रतिबंध दिनानिमित्त, राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
अंमली पदार्थ आणि मद्य यांच्या व्यसनाचा नकारात्मक परिणाम व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होतो, असे राष्ट्रपती म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाने दारिद्रयाला आमंत्रण मिळते तसेच राष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान मिळते. सरहद्दीवरील अंमली पदार्थांच्या तस्करीचे वाढते प्रमाण दहशतवाद आणि राजकीय अशांततेशीही निगडीत असते. त्यामुळे पंजाब आणि मणिपूरसारख्या सीमाक्षेत्रात अधिक दक्ष राहण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
जागरुक राहिल्यास अंमली पदार्थांच्या व्यसनाला पायबंद घालता येऊ शकतो. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य आणि मानसिक बळ मिळाले पाहिजे. या दृष्टीने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय उचलत असलेल्या पावलांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.