विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवनमान उंचावणे आवश्यक : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली – विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आनंद प्राप्त करण्याबरोबरच जीवनमान उंचावण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. केरळमध्ये कोची येथे आदिशंकर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते काल बोलत होते. या समारंभात उपराष्ट्रपतींच्या हस्ते “युवा वैज्ञानिक पुरस्कार 2018′ चे वितरण करण्यात आले.
आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती, विश्लेषण आणि तपास करण्याची क्षमता तसेच समस्येवर रुढ मार्ग टाळून नव्या उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती या तीन क्षमतांच्या आधारे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्टता साध्य करणे शक्य आहे, असे उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना सांगितले.
आदिशंकराचार्य हे केवळ एक महान तत्वज्ञ नव्हते तर ते उत्कृष्ट कवी सुध्दा होते, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. शिक्षणाने, ते प्राप्त करणाऱ्याला शहाणे केले पाहिजे आणि त्या शहाणपणाचा वापर आपल्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केला पाहिजे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपराष्ट्रपतींनी यावेळी मन:पूर्वक अभिनंदन केले.