येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्याची सुरुवात
नवी दिल्ली : बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्याने येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज संध्याकाळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला. यानंतर सर्वच स्तरावर टीका होत आहे.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसकडून टीका केली जात असतानाच आता मित्रपक्ष शिवसेनेही भाजपाला घेरले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बी.एस येडियुरप्पा यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, कर्नाटकात जे झाले ते लोकशाहीच्या विरोधात झाले होते. पण न्यायालयाच्या निर्णायमुळे विकृत मानसिकतेचा अंत झाला आहे. आणि ही अहंकार आणि हिटलरशाहीच्या अस्ताची सुरुवात आहे. कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकली जाते आणि सत्ता स्थापन केली जाऊ शकते असे वाटते असे वाटणाऱ्या विकृत मानसिकतेचा पराभव झाला आहे.